Wednesday 12 January 2011

वास्तविक, काल्पनिक आणि .....

ब्लॉगचं शीर्षक आहे वास्तविक आणि काल्पनिक आणि असं असताना पुन्हा त्यावरच्या पोस्टचं शीर्षक "वास्तविक, काल्पनिक आणि ....." वाचल्यावर काही मुद्रणदोष तर नाहीना अशी शंका कुणाच्या मनात डोकावण्या आधीच नमूद करू इच्छितो की असं काही नाहीय.  

वास्तविक म्हणजे जे प्रत्यक्षात घडतं.  ज्यावर आपलं अत्यल्प नियंत्रण असतं ते सारं काही. या अफाट विश्वाचा आपण एक अतिशय नगण्य असा हिस्सा असतो.   याउलट काल्पनिक  म्हणजे सर्व काही आपल्या नियंत्रणात असणारं विश्व.  या जगावर आपली शंभर टक्के हुकूमत असणारच.  म्हणूनच तर वास्तवातला एखादा कफल्लकही कल्पनेच्या विश्वात भरार्‍या मारताना मर्सिडिझ किंवा रोल्स रॉईसमध्येही विराजमान असतो.   गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी अन् म्हणायचा बांधीन मी माडीवर माडी ही ओळ उगाच नाही लोकांना मुखोद्गत झाली.  अर्थात काल्पनिक विश्वात तुम्ही पंचतारांकित उपाहारगृहातील जेवण जेवलात तरी त्याने तुमचे पोट भरत नाही पण वास्तविक जीवनात शिळी भाकर खाल्ली तरी ती पोटाला आधार देते.  वास्तवातली भाकर देखील कष्टाशिवाय मिळत नाही आणि कल्पनेत जगाचं साम्राज्यदेखील विनासायास मिळतं.  वास्तविक जगातल्या इतरांच्या तर सोडाच पण आपल्या स्वत:च्याही हालचालींवर आपलं पूर्ण नियंत्रण असत नाही हा इथला तोटा आणि काल्पनिक जगात आपण सर्वशक्तिमान असलो तरी या जगातली एकही गोष्ट आपल्याला भौतिक सुख देऊ शकत नाही हा या विश्वातला तोटाअसं असलं तरी या दोन्हींचे आपापले असे काही फायदे आहेतच की आणि ते तसे आहेत म्हणूनच सर्वांचं बरं चाललंय. 

या दोन्हींचे, म्हणजे काल्पनिक आणि वास्तविक या दोन्ही विश्वांचे तोटे (त्रुटी किंवा मर्यादा सुद्धा म्हणू शकता) एकत्र केले तर जे काय असेल त्याला काय म्हणणार?  लोक दोन गोष्टींमधले फायदे एकत्र करून आणि त्रुटी वगळून तिसरी गोष्ट निर्माण करतात आणि माझं हे भलतंच काय चाललंय असा विचार तुम्ही करत असणार.  पण तरीही जरा विचार करा की असं एखादं तिसरंच विश्व आहे ज्यावर आपलं नियंत्रण नाही (म्हणजे वास्तविक जगासारखंच की) आणि शिवाय इथे आपण कितीही मिळवलं तरी ते आपल्याला भौतिक सुख देऊ शकत नाही (म्हणजे पुन्हा काल्पनिक विश्वाशीच साम्य) तर त्याला तुम्ही काय म्हणणार? 

नाही फारसे कष्ट घ्यायची गरज नाही आणि कुठले नवीन नामकरणही करायला नकोय.  याला म्हणतात स्वप्न.  स्वप्नांवर आपलं काहीच नियंत्रण नसतं (निदान माझा तरी असाच अनुभव आहे).  स्वप्नात काय दिसावं यावर तर नाहीच नाही पण त्यावर कडी म्हणजे त्यात आपण काय करायचं यावरदेखील आपलं जराही नियंत्रण नसतं (वास्तविक विश्वात निदान अत्यल्प प्रमाणात का होईना आपण आपल्या मर्जीने काही कृती तरी करू शकतो, पण स्वप्नात ते अजिबात शक्य नाही).

वाईट स्वप्न पडलं तर आपल्याला मानसिक त्रास होतो आणि दिवस खराब जातो.  चांगलं तर स्वप्न पडलं तर ते अजूनच वाईट कारण स्वप्नात मिळालेलं सुख क्षणभंगूर ठरतं.  मला तर कित्येक वेळेला स्वप्नात अतिशय आकर्षक आणि मोहक गोष्टी (कुठल्या ते इथे सांगत नाही) मिळाल्या आणि नेमकी त्याचवेळी जाग येऊन अपेक्षाभंगाचं तीव्र दु:ख ही झालंय.  असो, तर मग स्वप्नाचा नेमका फायदा तरी काय? सकृत्द्दर्शनी पाहता तरी काहीच नाही.  उलट तोटेच तोटे (झोपेचा नाश हा तर सर्वात वाईट तोटा).  हरिश्चंद्राची कथा तर सर्वांना ठाऊकच आहे.  स्वप्नातल्या वचनाला जागून बिचारा सर्वस्व गमावून बसला.  पौराणिक कथा बाजूला ठेवल्या तरी स्वप्नांमध्ये फायद्याची अशी एकही गोष्ट दिसत नाही.  निदान माझे हे मत गेल्या सहस्त्रकाच्या अखेरपर्यंत तरी असेच होते.

माझे हे मत बदलले ते हिन्दुस्थान की कसम या चित्रपटामुळे.  नाही तो चेतन आनंदचा चित्रपट नाही.  तो हिन्दुस्थान की कसम वाईट होताच आणि हा ज्याचा मी उल्लेख करतोय तो वीरू देवगण यांचा अजूनच वाईट आहे.  वीरू देवगण यांनी साहस दृश्ये दिग्दर्शित करण्यात हयात घालविली आणि नंतर पुत्र अजयला दुहेरी भूमिकेत घेऊन (प्रेक्षकांवर डबल अत्याचार) हा चित्रपट काढला.  ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात त्यांनी जेवढे मोठे साहस केले त्याहून मोठे साहस त्या अत्यल्प प्रेक्षकांचे आहे ज्यांनी हा चित्रपट बघितला.  तर वीरू देवगण यांनी आपल्याला एक स्वप्न पडले होते आणि त्या स्वप्नात जे काही दिसले तीच या चित्रपटाची कथा आहे असे प्रदर्शनपूर्व मुलाखतीत सांगितले.  हे जेव्हा माझ्या वाचनात आले तेव्हा स्वप्नाचा फायदा मला प्रथम जाणवला.  देवगण यांचे लेखकाला द्यावयाचे मानधनाचे पैसे वाचले ना...

स्वप्नाचा असा प्रत्यय मला देखील येईल असे स्वप्नात ही वाटले नव्हते.  पुढे जवळपास दशकभराने म्हणजे नोव्हेंबर २००९ मध्ये मी जेव्हा मुंबईत रात्रभर भटकत होतो तेव्हा या भटकंतीतून काही तरी हाताशी येईल आणि त्यावर एखादा लेख लिहीता येईल असा मानस होता.  प्रत्यक्षात संपूर्ण रात्र भटकंती करूनही लेख लिहीण्यासारखं खास काही निदर्शनास आलं नाही.  सकाळी घरी पुण्याला परतल्यावर थकून झोपी गेलो.  स्वप्नात मला जे काही दिसलं त्यामुळे मात्र एक भला मोठा लेख लिहीता आला.  खरं तर मी आदल्या रात्री मुंबईत फिरलो ते दुचाकी घेऊन पण स्वप्नात मात्र मी मुंबईतल्या उपनगरी रेल्वेतून फिरत होतो आणि रात्री वास्तविक विश्वात वावरूनही मुंबईचं जे दर्शन घडू शकलं नाही ते घडलं या स्वप्ननगरीतून फेरफटका मांडताना.

त्यामुळे माझ्या लिखाणात नेहमी वास्तविक किंवा काल्पनिक (आणि कधी ह्या दोन्हींचं मिश्रण) असं असलं तरी ह्या लेखाच्या निमित्ताने या सर्वांच्या पलीकडल्या विश्वाचा देखील हातभार लागला.

No comments:

Post a Comment